Friday, January 16, 2015

विरक्त ? ? ( भाग तिसरा )


नारायणचे सुमारे पंचवीस हजार रुपये कुठे गेले असावेत हे एक कोडेच होते ..त्याचे खिसे आम्ही वारंवार तपासले..त्यालाही अनेक प्रश्न विचारले तरी याचे उत्तर एकच..मालूम नही..याद नही .बहुतेक याला दारू खेरीज झटपट लॉटरीचे अथवा जुगाराचे व्यसन असावे आणि हा त्यात पैसे हरला असावा ..किवा बाहेर एखाद्या स्त्री सोबत अनैतिक संबंध असतील तिला हे पैसे दिले असावेत असे आम्हाला वाटले ..तशी शंका आम्ही त्याच्या पत्नीजवळ बोलून दाखवली ..यावर तिने त्याला जुगार अथवा लॉटरीचे अजिबात व्यसन नाही हे तिने ठामपणे सांगितले ..अनैतिक संबंधांची शंका तर तिने हसून उडवून लावली ..म्हणाली त्याच्यात असे काही करण्याचे गट्स नाहीत..तसे धाडस देखील नाही ..मी माझ्या नवऱ्याची मजल कुठपर्यंत जाईल हे चांगले ओळखून आहे ..अर्थात प्रत्येक स्त्री ला आपल्या नवऱ्याची मजल कुठवर जाऊ शकते हे चांगलेच माहिती असते ..तिचे एकच म्हणणे होते की तुम्ही त्याची झडती नीट घ्या ..त्याने नक्की हे पैसे लपवून ठेवले आहेत कुठेतरी ..तो पगारातले पैसे नेहमी असे लपवून ठेवून नंतर व्यसनासाठी वापरतो ..शेवटी आम्ही त्याची पूर्ण कपडे काढून झडती घेतली ..तेव्हा त्याच्या अंडर वेअर मध्ये लपवून ठेवलेले एकोणीस हजार रुपये सापडले ..आम्ही थक्कच झालो ..आम्ही समजतो तितका हा बावळट नव्हता तर ..दारूच्या व्यसनामुळे येणारा विशिष्ट धूर्तपणा त्याच्याही अंगी उतरला होता ..एकदाचे पैसे सापडल्यावर पत्नीने निश्वास सोडला ...या उपचारांच्या वेळी पत्नीने नारायणच्या वरिष्ठांना भेटून तीन महिन्यांची बिनपगारी राजा मंजूर करून घेतली होती ...पहिल्या महिन्यात याने उपचार घेताना जरा टंगळमंगल केली ..मात्र दुसऱ्या महिन्या पासून गंभीरपणे उपचारात सहभागी होऊ लागला ..मानसोपचार तज्ञांची देखील औषधे सुरु झाली नियमित ..मात्र त्याचे रिफ्लेक्सेस अजूनही नीट नव्हते ..साधे हो किवा नाही असे उत्तर द्यायचे असेल तरी तो इतके अंगविक्षेप करी की समोरच्या व्यक्तीला वाटे हा खूप काहीतरी बोलणार आहे ..पाहता पाहता त्याच्या उपचारांचे तीन महिने पूर्ण झाले ..त्याला डिस्चार्ज न देता येथून मैत्रीतुनच कामावर जावू द्यावे..कामावरून सुटल्यावर त्याने परत घरी न जाता मैत्रीतच यावे अजून काही दिवस अशी योजना आम्ही त्याच्या बाबतीत बनवली त्याच्या पत्नीची संमती होतीच ..त्या नुसार त्याला चांगला दम देवून कामावर जाण्यास परवानगी दिली ..कामावरून सुटल्यावर इकडे तिकडे न भटकता ..सरळ मैत्रीत यायचे असे नीट डोक्यात घातले त्याच्या ..त्याच्या पत्नीने त्याची स्कूटर आणून दिली कामावर जाण्यासाठी तसेच रेल्वेच्या कॅन्टीन मध्ये त्याचे नाश्त्याचे आणि दुपारच्या जेवणाचे पैसेही भरले ..अजून काळजी म्हणून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे बँकेत जाॅइन्ट अकाऊन्ट उघडून त्याचा पगार त्या खात्यावर जमा होईल अशी सोय केली ..त्याने या साठी थोडी कुरकुर केली ..नंतर मान्यता दिली ..आम्ही रोज त्याला हात खर्चासाठी पाच रुपये देत असू ..परंतु हा इतका कंजूष कि ते पैसे तसेच परत आणत असे ..दारू सोडल्या पासून जणू त्याच्या साऱ्या इच्छा आकांक्षाच मरून गेल्या होत्या
नियमित सकाळी साडेसात वाजता तो सेंटरहून बाहेर पडे कामावर जाण्यासाठी ..सायंकाळी पाचला ऑफिस सुटले की सहा वाजेपर्यंत सुरक्षित सेंटरला परत येवू लागला ..त्याचे ऑफिस सेंटर पासून बारा किलोमीटर दूर होते ..अशी नोकरी दोन महिने सुरळीत झाली ..याच्या वेंधळेपणात आणि विसरभोळेपणात मात्र फारसा बदल होत नव्हता ..तसेच तो स्वतच्या राहणीमाना बाबत देखील फारसा जागरूक नसे ..शर्टाचे बटन तुटले आहे हे कोणीतरी सांगितल्याशिवाय त्याच्या ध्यानी येत नसे.. किवा त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही असे त्याला वाटे ..कामावर देखील याचा वेंधळेपणा माहित असल्याने त्याला जास्त जवाबदारीचे काम न देता शिक्के मारणे ..पत्रे डिस्पॅच करणे अशा प्रकारची सोपी कामे दिली जात ..आम्ही त्याला अनेकवेळा तू एखादा सेलफोन घे असा आग्रह केला ..परंतु त्याबाबत देखील तो उदासीन होता ..भर थंडीत त्याला एखादे जॅकेट अथवा स्वेटर घातले पाहिजे याचे भान नसे ..चपलेचा अंगठा तुटलाय ..नवीन चप्पल घ्यायला हवी याची दुसऱ्याने आठवण करून द्यावी लागे ..एकदा गम्मत झाली ..रात्रीचे आठ वाजले तरी हा कामावरुन सेंटरला परत आला नाही ..आम्हाला वाटले झाले...केली याने गडबड ..बहुतेक दारू प्यायला असावा परत ..आम्ही त्याच्या घरी फोन करून तो तेथे आलाय का अशी विचारणा केली तेव्हा पत्नीने नकार दिला ..मग आम्ही त्याला शोधायला बाहेर पडलो ..त्याच्या नेहमीच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर ..सुमारे आठ किलोमीटर दूर गेल्यावर हा गडी त्याची स्कूटर ढकलत घेवून येताना वाटेत भेटला ..किरकोळ प्रकृतीचा नारायण स्कूटर ढकलून घामाघूम झाला होता ..त्याला खूप दम लागला होता ..तरी हळू हळू मुंगीच्या वेगाने सेंटरकडे कूच चालली होती ..त्याला काय झाले विचारल्यावर स्कूटर बंद पडलीय असे उत्तर दिले त्याने ..अरे मुर्खा इतक्या दूर स्कूटर ढकलत आणण्या पेक्षा वाटेत स्कूटर एखाद्या मॅकेनिक कडे देवून सरळ ऑटो करून सेंटरला यायचे होतेस की असे आम्ही म्हंटल्यावर तो गोंधळाला ..अरे ..हे आपल्या लक्षातच आले नाही असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते ..तो स्कूटर तशीच ऑफिसला ठेवून देखील ऑटो करून सेंटरला येवू शकला असता .मात्र योग्य निर्णय घेण्याची त्याची क्षमताच नष्ट झालेली ..हे महाशय सुमारे बारा किलोमीटर स्कूटर ढकलत आणणार होते ..शिवाय एखादा फोन करून सेंटरला किवा घरी आपण अडचणीत आहोत हे कळवणे देखील त्याला सुचले नव्हते ..कठीणच होते एकंदरीत ..
नारायण असा एक वर्षभर सेंटरहून कामावर गेला ..नंतर दर शनिवारी रविवारी आम्ही त्याला घरी जाण्यास परवानगी दिली ..ते देखील त्याने नीट पाळले ..पुढे आठवडा भर घरी राहून शनिवार रविवारी सेंटरला यायचे असे सांगितले ते देखील विनातक्रार केले त्याने..आता सध्या त्याच्या व्यसनमुक्तीची सहा वर्षे पूर्ण होत आहेत ..तो घरीच राहतो ..परंतु वागण्यात फारसा बदल झालेला नाही असे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे ..घरी हा एखाद्या पाहुण्या सारखा राहतो ..फारसा कोणाशी बोलत नाही ..पत्नी देखील रेल्वेत दुसऱ्या विभागात नोकरी करते ..याने घरातील किरकोळ कामे केली पाहिजेत अशी तिची अपेक्षा असते ..परंतु याला ते सुचत नाही ..पत्नीला वारंवार त्याच त्याच गोष्टी सांगण्याचा कंटाळा येतो ..कामावरून घरी गेला कि याचा आवडता उद्योग म्हणजे किशोर कुमारची गाणी लावून ऐकत बसतो ..सेटरला असताना देखील तो म्युझिक थेरेपी मध्ये आवर्जून सहभाग घेत असे ..त्याचे पेटंट गाणे म्हणजे " आनेवाला पल ..जानेवाला है " थोडा बारीक आणि चिरका आवाज असूनहि तो अगदी तन्मयतेने हे गाणे म्हणत असे ..मुलाचा आभ्यास..स्वता:चे रहाणीमान..नीटनेटकेपणा.कुटुंबांसोबत सिनेमा ..हॉटेलिंग..फिरायला जाणे वगैरे गोष्टीत त्याला अजिबार रस उरलेला नाही ..हल्ली त्याचा स्कूटर चालवण्याचा आत्मविश्वास पण संपलाय ..तो ऑटोने जातो कामावर .. अशा वागण्याची आता पत्नीला देखील सवय झालीय ..तरीही ती वैतागली की एखादेवेळी आम्हाला फोन करते ..त्याला पंधरा दिवस सेंटरला पाठवते ..तेथे त्याला तुम्ही पुन्हा समजावा असे आम्हाला सांगते ..आम्ही त्याला समजावतो ..तो सगळे समजले ..आता वागण्यात बदल करीन असे अंगविक्षेप करून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ..घरी गेला की पुन्हा तसाच बावळट ..वेंधळा ..त्याचा मुलगा हुशार आहे खूप ..बारावीला ९३ टक्के मार्क मिळवून आता इंजिनियरिंग करतोय ..दारू सोडली तरी त्याच्या मेंदूवर दारूमुळे झालेले दुष्परिणाम तसेच आहेत ..कधी कधी वाटते हा विरक्त झालाय संसारातून ..केवळ कर्तव्य भावनेने नोकरी अन संसार करतोय ..' इदं न मम ' ...हे सगळे केव्हातरी सोडून जायचेय .मग याचा मोह नको हे तत्व यालाच जास्त समजलेय आपल्यापेक्षा ..म्हणजे हा अध्यात्मिकतेत आपल्याही पुढे पोचलाय बहुतेक ..मात्र त्याच्या सहवासात दोन तास राहिले की कळते...याची जगण्याची ..आनंद घेण्याची ..मूळ प्रेरणाच हरवलीय व्यसनामुळे !
( समाप्त )

विरक्त ? ? ( भाग दोन )


नारायणने पहिले चार दिवस आराम करून नंतर उपचारात सहभाग घेण्यास सुरवात केली ..एरवी नॉर्मल वाटणारा असला तरी व्यक्तिगत समुपदेशनाच्या वेळी आमच्या लक्षात आले की याचे रिफ्लेक्सेस कमी झाले आहेत ..म्हणजे आम्ही जे काही विचारतोय ..सांगतोय ..ते जसेच्या तसे आकलन करून ..त्याच प्रकारे त्याचे उत्तर देणे ..अथवा आम्ही जे सांगतोय ते त्याला समजतेय असे भाव चेहऱ्या दर्शवण्यात तो कमी पडत असे ..अनेकदा आम्ही बोलत असलो तर तो समजते आहे अशा आविर्भावाने नुसताच मान हलवीत राही मात्र नंतर परत आम्ही काय सांगितले ते सांग म्हंटल्यावर कोरा चेहरा करून आमच्याकडे पहात राही..हे दोन भावू ..नारायण लहान आणि दुसरा मोठा ..याने बी एस्सी केलेले ..पुढे देखील शिकायची इच्छा होती ..परंतु वडील गेल्यावर शिकणे कठीण झाले म्हणून ..वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी मिळाली ...ती करावी लागली ...हातात पैसा येवू लागल्यावर मित्रांच्या नादाने व्यसने देखील सुरु झाली ..वडिलांच्याच रेल्वेत असलेल्या मित्राच्या मुलीशी लग्न ठरले ..पत्नी देखील रेल्वेतच नोकरी करणारी ...संसार व्यवस्थित सुरु झाला मात्र दारूचे ग्रहण हळू हळू लागत गेले ..त्याच काळात एक मुलगा झाला ..पुढे पुढे व्यसन वाढत गेले ..घरातले वागणे बिघडले ..एरवी नम्रपणे वागणारा नारायण दारू प्यायल्यावर घरात मुजोरी करू लागला ..पत्नी अशा वागण्याने कंटाळून काही बोलली की हा भांडणे करी ..शिवीगाळ करी .. घरात ..रोजच्या कटकटी वाढल्या ..याचा सगळा पगार व्यसनात खर्च होऊ लागला ..पत्नीची नोकरी असल्याने घर नीट चालले होते .. तरीही रोजच्या घरातल्या कटकटी ..नोकरी ..घरकाम वगैरे सगळे एकाच वेळी सांभाळणे पत्नीला दिवसेंदिवस कठीण होऊ लागले ..शेवटी तिने माहिती काढून आम्हाला फोन केला होता ..
मानसोपचार तज्ञ डॉ. पानगावकर यांच्याकडे नारायणला दाखवले तेव्हा त्यांनी सांगितले ..दारूमुळे याच्या मेंदूतील न्युरॉन्सची हानी झालीय ..आपल्या मेंदूत कोट्यावधी न्युरॉन्स असतात जे ..वेगवेगळ्या प्रकारची हजारो बारीक सारीक आणि महत्वाचे कामे करत करतात .. आकलन ..स्मरण ..प्रतिक्रिया देणे ..ज्ञानेंद्रियांच्या मार्फत येणाऱ्या संवेदना जतन करून त्यांचे विश्लेषण करणे ..वगैरे प्रकारची तसेच ..स्वता:च्या शरीरात निर्माण होणा-या संवेदना अनुभवणे ..थकवा ..आराम ..दमणूक ..तहान -भूक ..वेदना ..या सारख्या संवेदना अनुभवण्याचे तसेच त्या बाबत योग्य प्रतिक्रिया देण्याचे काम हे न्युरोंस अगदी सहजपणे आपल्या नकळत करत असतात ..तसेच आत्मिक भान ..समाजिक भान ..कौटुंबिक भान... या बाबत देखील हे न्युरॉन्स संस्कारा नुसार.. व्यक्तीच्या मुळच्या प्रवृत्ती नुसार ..अथवा अनुभवानुसार वर्तन करण्याची प्रेरणा देत असतात ..दारू अथवा मादक द्रव्यांच्या सेवनामुळे या मज्जातंतूंची हानी होत असते..मुख्य म्हणजे एकदा हानी झालेले मज्जातंतू पुन्हा निर्माण होत नाहीत त्यामुळे अनेक प्रकारची बारीक सारीक ..मात्र महत्वाची कामे मेंदू सहजगत्या करू शकत नाही ...नेमकी कोणाची किती आणि कोणत्या प्रमाणात दारू प्यायले तर ही हानी होईल याचे काही नक्की गणित नसते..काही लोकांच्या बाबतीत अगदी कमी प्रमाणात दारू प्यायल्याने देखील अशी हानी होऊ शकते..नारायणचे देखील तसेच झालेय ..याला गोळ्या देवून आपण काही प्रमाणात मदत करू शकतो ..ज्या योगे त्याचे रिफ्लेक्सेस योग्य होतील ..तरीही सगळे नुकसान भरून काढता येणे सायन्सच्या आवाक्या बाहेरचे आहे ..याने जर नंतर नियमित योगाभ्यास ..प्राणायाम ..ध्यान या सारखे व्यायाम केले तर कदाचित तो पुन्हा पूर्वीसारखा सर्वसाधारण होऊ शकेल ..जरी नुकसान झालेले न्युरॉन्स पुन्हा निर्माण होत नसले तरी ..जे शिल्लक आहेत त्या न्यूरॉन्सना या वाढीव कामाची जवाबदारी देण्याची प्रेरणा प्राणायाम आणि योगाभ्यासा द्वारे शक्य होऊ शकेल ..डॉ.शैलेश पानगावकर यांचे कडे गेल्यावर आम्हाला नेहमी मानसिकते बद्दल अथवा मेंदुंच्या कार्यप्रणाली बाबत काहीतरी नवीन माहिती मिळत असते ..नारायणला डॉक्टरांनी दोन प्रकारच्या गोळ्या लिहून दिल्या ..त्याला तीन महिने ठेवावे असे आम्ही पत्नीला सुचवले होते ,,मात्र पूर्वी याने अनेक दांड्या मारल्यामुळे याला एका महिन्यापेक्षा जास्त सुट्टी मिळणे कठीण होते..आधीच कामचुकार पणा केल्याने त्याचे डीमोशन झालेले होते नोकरीत ..नोकरीत हा सिनियर असून देखील याला फारसे जवब्दारीचे काम दिले जात नसे ...
एक महिना उपचार घेवून हा बाहेर पडला तेव्हा ..मानसोपचार तज्ञांची औषधे ते सांगेपर्यंत नियमित घेणे ..फॉलोअप ठेवणे ..व्यसनी मित्रांना भेटणे टाळणे वगैरे प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या त्याला ..याने मान जोरजोराने होकारही दिला ..मात्र नव्वद टक्के लोक आमच्या सूचनांचे पालन करत नाहीत या अनुभवानुसार घडले ..नारायणने नंतर अजिबात संपर्क केला नाही आमच्याशी ..साधारण पंधरा दिवसात त्याच्या पत्नीचा पुन्हा फोन आला .." वो बहोत पिकर घरके आसपास घूम रहे है..मै आपको फोन करूंगी इस डरसे घरमे नही आ रहे..आप गाडी लेकर आ जावो ..घरके आसपास वो मिल जायेंगे आपको ..उन्हे फिरसे मैत्री में अॅडमिट कर दो " त्या नुसार आम्ही तो राहत होता त्या भागात गेलो ..आसपासच्या दुकानदारांकडे नारायण दिसला का चौकशी केली ..तो जवळच असलेल्या एका दारूच्या दुकानात बसलाय हे समजले ...आम्ही तेथे जावून त्याला दुकानातून उचलून आणले ..आम्ही त्याला घराच्या बाहेर देखील पकडू शकतो याचा त्याला अंदाज नव्हता..त्याला सेंटरला आणल्यावर त्याची झडती घेतली तेव्हा दोन हजार रुपये सापडले त्याच्या .खिशात ..आम्ही पत्नीला ते कळवले तर तिला धक्काच बसला ..म्हणाली दोन नाही जास्त पैसे असायला हवेत त्याच्याकडे ..त्याचा नुकताच पगार झालाय ..तसेच दिवाळीचा बोनस देखील मिळालाय त्याला ..त्याच्या खिश्यात किमान पंचवीस हजार रुपये असायला हवेत ...हे ऐकून आम्ही बुचकळ्यात पडलो ..इतके पैसे याने कोणाला दिले ..की नशेत कोणी काढून घेतले हे समजेना ..त्याला विचारले तर मला आठवत नाही असे उत्तर दिले त्याने ..
( बाकी पुढील भागात )

विरक्त ? ? ( भाग पहिला )


" नमस्ते भैया ..आज उनको भेज रही हु सेंटर ..अभी चार दिन छूट्टीया है उनको ..शाम को सेंटर आ जायेंगे तो फोन कर देना...और जरा उन्हे अछेसे समझा देना फिरसे " उमा भाभींचा असा फोन दर दोन तीन महिन्यांनी येतोच ..मला किवा रविला फोन करून त्या हा निरोप देतात ..नवऱ्याला काही दिवस फॉलोअप साठी मैत्रीत पाठवते आहे ..त्याला पुन्हा एकदा नीट समजावून सांगा संसार म्हणजे काय असते ते ..नुसती दारू सोडली म्हणजे त्याने मोठा पराक्रम केलेला नाहीय ..वागण्यात अजून खूप बदल केले पाहिजेत वगैरे ...आम्ही भाभींनाच समजावतो ..फिलहाल वो शराब नाही पी रहे है ये कितनी बडी बात है..आपको इसिमे खुश रहेना होगा हमको ..धीरे धीरे सारी जिम्मेदारीयाँ भी निभायांगे वो ..यावर यांचे ठरलेले बोलणे ..भैया अभी पाच साल हो गये ना शराब छोडकर ..अभी तो नॉर्मल जिंदगी जीना चाहिये " ...यावर आम्ही फक्त थातूर मातुर उत्तर देतो ..हे असे तीन दोन वर्षांपासून सुरु आहे ..संध्याकाळी बरोबर आठ वाजता नारायण सेंटरला आला ..अगदी पहिल्या दिवशी त्याला पहिला होता तसाच किरकोळ शरीरयष्टीचा ...चालताना थोडे खाली वाकून चालणारा ..चष्मा ..चेहऱ्यावर उसने आहे हे समजणारे हास्य..बोलण्यात देखील उसनी वाटणारी नम्रता .." क्यों कैसा चल रहा है ? ..सबकुछ ठीकठाक ? आमच्या या प्रश्नावर तो ..दोन्ही हात हवेत हलवून..सगळे आलबेल असल्याची खुण करेल ..खूप काही बोलायचे आहे असे त्याच्या शरीरभाषेतून वाटेल ..पण नुसताच इशारा करून पुन्हा चेहऱ्यावर उसने हसू आणून आमच्या पुढच्या प्रश्नाची वाट पाहील.." आपने अभीतक मोबाईल नाही लिया ? ..पैदल आये के स्कूटरपे ? ..मोबाईलच्या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर असते ते असे की ..वो फालतू झंझट संभालना पडता है..लेकीन लेनेवाला हु जल्दी ..आणि स्कूटर साठी उत्तर असेल ..उमा मना करती है स्कूटर चलानेके लिये .." असे उत्तर देवून तो आम्ही केव्हा वार्डमध्ये जा असे सांगतोय याची वाट पाहत उभा राहील मक्ख..! ठीक है जाओ अंदर असे म्हणताच आनंदाने हसून वार्डमध्ये जाईल !
पाच वर्षापूर्वी नारायणला जेव्हा आम्ही घरून उचलून उपचारांना आणायला गेलो होतो तेव्हाचा प्रसंग मला आठवला ..तेव्हा त्याच्या पत्नीचा फोन होता ..वो दस बारा सालसे शराब पी रहे है..रेल्वे मे नोकरी करते है..किसीकी बिलकुल मानते नही..कुछ बोलो तो गालीयाॅ देते है..वगैरे ...तुम्ही त्यांना उपचारांसाठी घेवून येवू शकणार नाही का ? असे विचारल्यावर त्याच्या पत्नीने एकदम भूत पहिल्या सारखे घाबरून उत्तर दिले ..बापरे ..ये नही हो सकेगा..वो बहोत खतरनाक है..मेरी तो जान ले लेंगे वो अगर मैने उन्हे कहा तो ..तिची हतबलता स्पष्ट होती ..शेवटी आम्हीच त्याला घरून उचलून आणायला गेलो होतो ..तीन खोल्यांचे छोटेसे घर ..बाहेरच्या खोलीत हा पलंगावर पडून टी.व्ही पहात होता ..एकदम अनोळखी माणसे घरात शिरलेली पाहून पटकन उठून बसला..प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहू लागला ..बनियन व बर्म्युडा होती अंगावर ..नारायण तुम्हीच का असे विचारल्यावर ..त्याने तुम्ही कोण असा आम्हालाच उलट प्रश्न केला ..तितक्यात आतल्या खोलीतून त्याची पत्नी बाहेर आली ..तिच्या मागे एक लहान साधारण दहाबारा वर्षाचा मुलगा घाबरल्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत उभा होता .." किसीकी सुनतेही नही है..रोज शराब पिते है.." अशी पत्नीने सुरवात केली ..आम्ही त्याला म्हणालो ..चलो आप हमारे साथ कुछ दिन रहो ..हे व्यसनमुक्ती केंद्राचे लोक असणार हे बहुतेक समजला तो ..कपडे पहेनता हु..असे म्हणत पटकन आतल्या खोलीत गेला..आम्हाला वाटले मागच्या दाराने पळून जाईल की काय ..आम्ही त्याच्या पत्नीला तसे सांगितले तर ..घराला मागचे दार नाही हे सांगून तिने आम्हाला निर्धास्त केले ..त्याचा लहान मुलगा टिपिकल दक्षिण भारतीय दिसत होता..कपाळावर गंध लावलेले ..निरागस चेहरा ..चष्मा घातल्यामुळे एकदम स्कॉलर वाटणारा ..दहा मिनिटे झाली तरी हा आतल्या खोलीतून बाहेर येईना ..शेवटी त्याची पत्नी तो काय करतोय ते पाहायला आत गेली ..लगेच घाबऱ्या मुद्रेने बाहेर आली ..उनके हात मे छुरी है..मेरेको किसीने हात लागाय तो मार डालुंगा उसको..ऐसा बोल रहे है..
असे प्रकरण असले की आम्हाला अजून चेव येतो ..आव्हान वाटते ..जास्तीत जास्त काय करेल एखादा वार करेल चाकुचा अंगावर ..तोवर इतर धरतील त्याला ही खात्री असते आम्हाला ..शिवाय चाकू हाती घेणे आणि तो कोणाला तरी मारणे यात जमिन अस्मानाचा फरक असतो..चाकू कोणीही हाती घेवू शकतो परंतु तो मारण्यासाठी जिगर लागते ..त्याची शरीरयष्टी आणि चेहरा पाहून..तसेच त्याचे डोळे पहाता ती जिगर त्याच्याकडे नाही हे आम्हाला उमगले होते ..ठीक है देखते है हम अंदर जाकर..असे आम्ही म्हणताच त्याची पत्नी घाबरली ..काहीतरी भयंकर होणार या कल्पनेने तिचा थरकाप झाला ..जाने दिजीये अभी ..बादमे आकार लेके जान उनको ..वो सो जाने के बाद..असे म्हणू लागली ..मात्र आता आम्ही आव्हान स्वीकारले होते ..आम्ही आतल्या खोलीत गेलो तर तो हातात चाकू घेवून आमच्याकडे रागाने पाहू लागला ..त्याच्या चाकू धरण्याच्या पद्धतीवरून तो नवखा आहे हे समजलेच ..आमच्यातील एका कार्यकर्त्याने पुढे होऊन ' क्युं रे साले ..डराता है क्या हमको ..असे म्हणत पटकन त्याचा हात पकडला.दुसर्याने त्याच्या हातातील चाकू घेतला..त्याला काही समजण्याच्या आतच तो निशस्त्र झाला होता ..मग त्याला तसाच उचलून बाहेर आणला ..त्याची पत्नी आणि मुलगा आ वासून आमच्या कडे पाहत राहिले ..आप इनका सामान लेकर फॉर्मालिटीज पुरी करनेके लिये आ जाना सेंटरपे असे म्हणत आम्ही त्याला बनियन आणि बर्म्युडावरच गाडीत घातले !
( बाकी पुढील भागात )

Friday, November 14, 2014

प्रिन्स ? ? ( भाग तीन )


दुसऱ्यांदा उपचार घेण्याच्या वेळी त्याचा पवित्रा तोच राहिला ..तो नाईलाजाने सेंटरला राहतोय असेच त्याच्या शरीरभाषेतून दर्शवत राहिला ..सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या थेरेपीज साठी त्याच्या मागे लागावे लागे ..प्रत्येक वेळी तो माॅनीटरशी वाद घाले ..या वेळी आम्ही त्याच्या आईला त्याला अजिबात भेटू नये अशा सूचना दिल्या होत्या ..मात्र तीने आमचे ऐकले नाही ..ती आलीच भेटायला ..अनेकदा आमच्या उपचारात पालकांचा हवा तसा सहभाग मिळत नाही ..आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन पालक करत नाहीत ..अर्थात त्या मुळे उपचार घेणाऱ्या व्यसनीला आम्ही जी मानसिक शक्ती मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यात आम्हाला यश येत नाही ..उपचारात पालक ..प्रत्यक्ष व्यसनी आणि समुपदेशक यांचा तिघांचा योग्य सहभाग गरजेचा असतो ..या पैकी व्यासानीचा सहभाग योग्य नसणार हे गृहीत असते ..मात्र पालक देखील तसेच असतील तर आमची अडचण होते ..तीस टक्के पालकांचा आम्हाला असा अनुभव आहे की ते अजिबात आमच्या सूचनांचे पालन करत नाहीत ..त्यांच्या वेड्या मायेपोटी म्हणा किवा काळजी पोटी म्हणा ते स्वताच्या मर्जीनेच वागतात ..या वेळी देखील तसेच झाले ..त्याला आता किमान तीन महिने उपचार द्यावे लागतील असे आम्ही सांगितले होते ..मात्र त्याची आई त्याला एका महिन्यातच घरी घेवून गेली ..या वेळी त्याचा मुंबईला राहणारा मोठा भावू देखील आला होता आई बरोबर ..त्या भावाने देखील तक्रार केली ..की आई त्याचे खूप लाड करते ..आम्हाला नकळत त्याला पैसे पुरवते ..कितीही सांगितले तरी ती कोणाचे ऐकत नाही ..भावू त्याला तीन महिने सेंटरला ठेवायला तयार होता ..परंतु आईच्या हट्टापुढे भावाचे काहीही चालले नाही ..सध्या हा नोकरी वगैरे करत नाहीय ..त्या मुळे दिवसभर रिकामाच असतो ..त्याला तुम्ही रोज सेंटरला फॉलोअप साठी व डेकेअर साठी पाठवा असे आम्ही आग्रहाने आईला सांगितले ..आईने हो ला हो केले ..परंतु एकदा सेंटरच्या बाहेर पडल्यावर तो अजिबात सेंटरला फिरकला नाही ..मानस शास्त्रात ' किंग बेबी सिंड्रोम ' नावाची एक अवस्था सांगितली जाते ..अशा व्यक्तीचे लहानपणापासून इतके लाड केले जाता कुटुंबियांकडून की नेहमी त्याला हवे ते मिळत जाते ..त्याला कशासाठीच संघर्ष करावा लागत नाही ..आपले मुल सतत आनंदी राहावे म्हणून आईबाप त्याची प्रत्येक मागणी योग्य आहे अथवा अयोग्य आहे याचा विचार न करता पूर्ण करतात ..नकळत त्याला आपण राजपुत्र आहोत असे वाटू लागते ..मग त्याला नेहमीच सगळे काही माझ्या अपेक्षेनुसारच घडावे असे वाटत राहते..तसे घडले नाही तर तो कुटुंबियांना मी आत्महत्या करीन ,,घर सोडून निघून जाईन ..जेवणार नाही..वगैरे प्रकारच्या धमक्या देवून इमोशनल ब्लॅकमेल करतो ..
पुढे पुढे केवळ कुटुंबियांकडूनच नव्हे तर सगळ्या जगाकडून त्याच्या अशाच अपेक्षा असतात...प्रत्येक वेळी मनासारखे घडावे म्हणून तो जिवाचा आटापिटा करतो .. स्वता:च्या शर्ती वर जिवन जगत जातो ..खरे तर जिवनात हार-जीत, यश -अपयश , सुख -दुख: , हे सगळेच प्रत्येकाच्या वाट्याला येत असते ..स्वताच्या अटी आणि शर्तींवर कोणालाच जगायला मिळत नसते ..या प्रकारच्या अनुभवातूनच जीवनाचे सार समजून घेवून...समजूतदार पणा किवा प्रगल्भता येते ..प्रत्येक वेळी मनासारखे घडत नाही तर काही वेळा मला जे घडतेय त्याच्याशी जुळवून घ्यावे लागते ही शिकवण मिळते ..त्यातूनच संपन्न व्यक्तिमत्व आकाराला येते ..परंतु याच्या बाबतीत तसे झालेच नव्हते .त्यामुळे जेव्हा याला जगाच्या वास्तवाचा सामना करावा लागला तेव्हा ..याच्याकडे जुळवून घेण्याची कला नव्हती ..हा लगेच चिडचिड करी ..निराश होई ..वैफल्यग्रस्त होऊन दारूचा आधार घेई ..पुन्हा दोन महिन्यातच आईचा फोन आला ..हा पुन्हा खूप प्यायला लागला आहे ..याला जबरदस्तीने घेवून जा उपचारांना ..आम्ही त्याच्या आईला सांगितले की तुम्ही आमच्या सूचनांचे पालन करत नाही ..त्यामुळे तो नीट उपचार घेत नाही ..मागच्या वेळी आम्ही त्याला तीन महिने ठेवा असे सांगून देखील तुम्ही त्याला एका महिन्यात घरी नेले ..या वेळी जर असे करणार असाल तर आम्ही त्याला दाखल करून घेत नाही ..यावर त्याच्या आईने या वेळी तुमचे ऐकीन ..त्याला नक्की तीन महिने ठेवीन .,माझ्यावर उपकार करा वगैरे विनंती केली ..शेवटी आम्ही त्याला उचलून उपचारांना घेवून आलो ..या वेळी देखील त्याने आईला अर्वाच्च शिव्या दिल्या ..जिने त्याचे सर्वात जास्त लाड केले होते त्या आईलाच तो अशा शिव्या घालत होता ..आता तरी आई याला योग्य उपचार घेवू देईल अशी आशा होती आम्हाला ..पण कसचे काय ..
पंधरा दिवसांनी त्याच्या आईचा फोन आला मुंबईहून ...मी मोठ्या मुलाकडे सुनेचे बाळंतपण आहे म्हणून आलेय ..त्याची खूप आठवण येतेय मला ..एकदा तरी फोनवर बोलू द्या मला त्याच्याशी..आम्ही नकार दिला मात्र ती हट्टाला पेटली ..आम्ही नाईलाजाने त्याला फोन दिला ..आई मुंबईला गेलीय हे समजल्यावर तो चिडला तिच्यावर ..तू मला न सांगता ..न विचारता कशी गेलीस म्हणून भांडू लागला ..मग लवकर इथे ये ..मला घरी घेवून जा हे नेहमीचे सुरू केले ...शेवटी आम्ही फोन काढून घेतला त्याच्या हातून ..आता तुम्ही निवांत तीन महिने रहा मोठ्या मुलाकडे मुंबईला तोवर याला इकडे उपचार घेवून द्या असे बजावले त्याच्या आईला ..ती हो म्हणाली ..मात्र तिचा होकार ठाम नव्हताच ..त्याचा उपचारांचा एक महिना पूर्ण झाल्यावर दोनच दिवसात ही मोठ्या मुलासह सेंटरला हजर..त्याची खूप आठवण येतेय ..भेटायचे आहे म्हणू लागली ..मोठा भावू समजूतदार होता ..त्याने तिला मनाई केली तरीही शेवटी आईच्या हट्टामुळे तो तिला मुंबईहून नागपूरला घेवून आला होता ..त्याला भेटल्यावर व्हायचे तेच झाले ..त्याने घरी घेवून चल असा आग्रह केला .. त्यावर मोठ्या भावाने त्याला सांगितले की सध्या अजून दोन महिने आई माझ्याकडे मुंबईला राहणार आहे ..तुला यायचे असेल तर आमच्यासोबत मुंबईला चल किवा अजून दोन महिने सेंटरला रहा..हा मुंबईला भावाच्या घरी जाणे शक्यच नव्हते ..कारण तेथे आपले लाड होणार नाहीत हे त्याला चांगले ठावूक होते..मी मुंबईला पण येत नाही आणि सेंटरला पण राहणार नाही ..त्या ऐवजी मी इथल्याच घरी एकटा राहीन ..आईला जावू दे मुंबईला तुझ्यासोबत असा तिसराच पर्याय याने सुचवला ..आम्ही सगळ्यांनी ठाम नकार दिला ..तू इथे एकटे रहायचे नाहीस अजिबात..असा पवित्रा घेतला ..तरीही त्याने त्याचा हट्ट सुरु ठेवला .. पुन्हा आईच्या हृदयाला पाझर फुटला ..शेवटी त्याला दोन वेळचा डबा लावून द्यायचा ..जवळ मोजके पैसे ठेवायचे ..त्याने नागपुरातच घरी एकटे राहायचे ..रोज सेंटरला भेटायला यायचे असे ठरले ..आई सुनेचे बाळंतपण होईपर्यंत मुंबईलाच रहाणार होती ..पुन्हा त्याच्या मनासारखेच झाले होते ..आई आणि भावू त्याला घेवून गेले ..तो फॉलोअपला येणार नाही अशी खात्रीच होती आमची ..तसेच झाले ..मध्ये जेमतेम पाच सहा दिवस गेले असतील ..एकदा सकाळी स्थानिक वर्तमानपत्रात बातमी आली .." तरुण अभियंत्याची आत्महत्या " याचेच नाव दिले होते त्या बातमीत ..राहत्या घरी गळ्यावर आणि सर्वांगावर ब्लेडचे वार करून घेवून त्याने आत्महत्या केली होती ..आम्ही सगळे खूप हळहळलो ..त्याचे सगळे सोपस्कर करून नंतर आई आली होती सेंटरला..भकास चेहऱ्याने ..आम्हाला काय बोलावे सुचेना ..दहा मिनिटे सगळे निशब्द होते ..शेवटीच तीच बोलली " सुटले सगळेच "..मग तोंडाला रुमाल लावत घाईने बाहेर पडली !
( समाप्त )

Thursday, November 13, 2014

प्रिन्स ? ? ( भाग दोन )


आधीच सकाळी सकाळी तो बराच पिवून आला होता ..त्यात आता पुन्हा चार तासात त्याने अजून प्यायल्यावर तो चांगलाच चार्ज झाला ..मोठ्याने बरळू लागला .." ये दारू वगैरा छोडना सब अपने मन के उपर होता है..मै जब चाहे तब छोड सकता हुं ..वो भी घर मी रहेकर..लेकीन ये मां पीछे पडी इसलिये यहा तक आया हु ..अभीतक कई बार छोड चुका हु मै शराब ..क्यू बराबर है ना ? तो प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहू लागला ..आता याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता ..तो वेगळ्या विश्वात गेला होता तर मी वास्तवात होतो ..मी नुसतीच दुजोरा म्हणून मान हलवली ..खरे तर दारू सोडण्यापेक्षा ती सोडलेली कायम बंद ठेवणे हेच अधिक कठीण असते ..काही दिवसातच पिणे पुन्हा सुरु होते ..हीच तर खरी समस्या असते ..पुन्हा सुरु होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हेच शिकावे लागते व्यसनमुक्ती केंद्रात ..तो असेच काहीतरी बरळत गेला .. शेवटी सोफ्यावर मान टाकून लूढकला ..आमचे कार्यकर्ते त्याला उचलून आत घेवून गेले ..त्याची आई जाताना पुन्हा एकदा याची नीट काळजी घ्या ..काही कमी पडू देवू नका याला ..काय लागतील ते पैसे देईन मी..असे बजावून गेली ..संध्याकाळी त्याची दारू उतरली तेव्हा तो भानावर आला..आपण कुठे आहोत हे जाणवले ..आसपास बाकी उपचारी मित्रांची थट्टा मस्करी चाललेली होती ..याने उठून सरळ ऑफिसचा रस्ता धरला .." सर ..मुझे यहा नही रहेना...मेरी माँ को बुला लीजिये ..मुझे स्पेशल रूम अगर मिलती है..तो रहूंगा ..इतनी भीड के साथ नही रहे पाउंगा..आम्हाला हे अपेक्षितच होते ..स्वतःहून जरी उपचारांना एखादा आलेला असला तरी व्यसनमुक्ती केंद्राबाबत त्याला योग्य माहिती असेलच अशी खात्री नसते ..आपल्याला छान एखाद्या खोलीत आराम करायला मिळेल महिनाभर असे त्याला वाटत असते ..शिवाय दिमतीला नर्स ..डॉक्टर ..हाताशी असलेली बेल वाजवली की सेवेला हजर होणारा वार्ड बॉय..सलाईन ..वेगवेगळ्या तपासण्या ..हवे ते जेवण ..अशा कल्पना असतात अनेकांच्या ..एखाद्या खाजगी हॉस्पिटल प्रमाणे आपली बडदास्त ठेवली जाईल अशी त्याची अपेक्षा असते ..भानावर आल्यावर त्याला समजते की इथे आपल्या स्वातंत्र्यावर गदा आलेली आहे ..सकाळी वेळेवर उठणे ..रात्री वेळेवर झोपणे ..शिवाय एका विशिष्ट टाईम टेबलचे पालन करणे ..ज्यात समूह उपचार ..योग्याभ्यास ..प्राणायाम ..डायरी लेखन वगैरे करावे लागणार आहे ..हे सारे सुरवातीला त्याच्या पचनी पडणे कठीणच ..कारण घरी त्याला त्याच्या मर्जीने जगायची सवय असते ..इथे त्याला टाइम टेबल नुसार वर्तन करावे लागते ..रवी ने त्याला समजाविले की पहिले काही दिवस तुला येथे कदाचित आवडणार नाही ..पण नंतर नंतर सराव होईल सगळ्या गोष्टींचा ..तो वर तू तीन दिवस आराम कर ..आधी शरीरिक सृष्ट्या सक्षम हो ..औषधे घे वगैरे ..तर म्हणाला मला एकदा तरी फोन वर आईशी बोलू द्या ..आम्ही त्याला नकार दिला ..तू इतके दिवस आईसोबतच तर होतास..इथे येवून तुला जेमतेम आठ तास झालेत ..त्याच्या सगळ्या मागण्या गोड बोलून रवीने धुडकावल्यावर तो नाराजीने वार्डात गेला ..फंस गया यहाँ आकर..असे बडबडला जाताना .
तीनचार दिवस आराम करून झाल्यावर .. आता तुला इतरांप्रमाणे टाईमटेबलचे पालन करावे लागेल असे सांगितल्यावर त्याने पुन्हा कटकट केली ..मी माझ्या मर्जीने आलोय इथे ..त्यामुळे सगळे माझ्या मर्जीनेच करेन असा हट्ट होता त्याचा ..प्रेत्येक थेरेपिच्या वेळेस तो माॅनीटरशी वाद घाले ..वार्डच्या सफाईची जवाबदारी वार्डातील मित्रांवरच सोपवलेली असते ..त्या नुसार सकाळ संध्याकाळ वार्डात झाडू मारण्याचे काम आळीपाळीने दोघांवर येत असते ..त्या वेळी देखील त्याने तमाशा केला ..मी झाडू मारणार नाही ..मी असातसा माणूस नाहीय..इंजिनियर आहे ..माझ्या हाताखाली चार नोकर होते पूर्वी ...वगैरे ! बाबारे इथे सगळेच चांगल्या घरचे लोक आहेत ...सगळे आपापल्या घरचे राजा आहेत ..परंतु इथे आपल्या मानसिक सुधारणे साठी ..हे सगळे सगळ्यांना करावे लागते ..शिवाय झाडू मारणे हे काही हलके काम नाही ...घरी हे काम आपल्या घरातील स्त्रिया करतातच की..असे तला समजावले..परंतु तो अजिबातच झाडू मारणार नाही म्हणून हटूंन बसला .मग आम्ही आयडिया केली ..तू नको मांरूस झाडू तुला आवडत नसेल तर ..पण मग तुला इथे ज्या आठ बिड्या मिळतात त्या मिळणार नाहीत ..ही मात्र बरोबर लागू पडली ..बिडी मिळणार नाही म्हंटल्यावर तो नाईलाजाने झाडू मारण्यास तयार झाला ..असे कटकट करतच दहा दिवस उलटले ..रविवारी जेव्हा त्याची आई भेटायला आली तेव्हा याने आता मी सुधारलोय .घरी घेवून चाल म्हणून तगादा लावला तिच्यामागे..तिला अनेक तक्रारी केल्या ..ती आम्हाला म्हणाली ..अहो हा सांगतोय ते बरोबर आहे ..घरी खरेच याने कुठलेच काम केले नाहीय कधी ..याचे वडील सैन्यात मेजर होते ..आमच्या घरी नेहमी आॅर्डली असे सगळ्या कामांसाठी ..याला खूप लाडात मोठा केलाय आम्ही ..तेव्हा कृपया याला झाडू मारायला सांगू नका ..झाडू मारणे हे हलके काम नाही हे तिला पटवायला आम्हाला खूप कसरत करावी लागली ..तुम्ही त्याचे फार लाड केलेत म्हणूनच तर तो बिघडलाय ..याला आपण सर्वसामान्य आहोत असे वाटत नाहीय ..एखाद्या राजपूत्रा सारखे स्पेशल आहोत असे वाटतेय ..आपण काहीही केले तरी..कसेही वागले आपले काही वाकडे होणार नाही हा अहंकार आहे याचा ..तुम्ही किती दिवस पुरणार आहात याला ? केव्हातरी याला जगाचा सामना करावा लागणारच आहे ..संघर्ष करावा लागणारच आहे ..त्या साठी आम्ही त्याला तयार करतोय ..अहंकार कमी केल्याखेरीज कायमची व्यसनमुक्ती मिळणे कठीण असते ..दारू मुळे माझे काही नुकसान होऊ शकणार नाही हा अहंकारच तर आहे याचा...म्हणूनच तर तो बिनदिक्कत दारू पितो ..खूप समजावले त्याच्या आईला ..मात्र तिने आमचे ऐकले नाही ..मुलाच्या हट्टाला बळी पडली बिचारी ..त्याला उपचार पूर्ण न करताच डिस्चार्ज करून घेवून गेली ..
पालकच ऐकत नाहीत म्हंटल्यावर आमचा नाईलाज असतो..आम्ही जावू दिले त्याला ..महिनाभरातच त्याच्या आईचा फोन आला ..अहो याचे पिणे पुन्हा वाढलेय ..आता स्वतःहून यायला तयार नाहीय तो तुमच्याकडे ..मी याला रोज फक्त एक क्वार्टर पिण्याची परवानगी दिली असूनही हा जास्त पितोय ..कृपया तुम्ही त्याला जबरदस्ती घेवून जा ..धन्य होती त्या आईची ..मुलाच्या हट्टापायी त्याला रोज एक क्वार्टर पिण्यास परवानगी दिली होती तिने ..अर्थात दारुड्याला अशी मर्यादा पाळता आली असती तर तो दारुडा झालाच नसता ..आम्ही तिच्या विनंती नुसार त्याला आणायला त्याच्या घरी गेली तर संभ्रमात पडलो ..छोटेसे दोन खोल्यांचे घर ...ते पण भाड्याचे..तो म्हणला तसे मालदार वगैरे नव्हते घरचे लोक ..मग त्याच्या आईकडून समजले की वडील गेल्यावर भावू पुण्याला नोकरी लागली म्हणून तेथे गेला होता ..त्या दरम्यान याला व्यसन लागलेले ..त्यासाठी वडिलांची सगळी जमापुंजी याने दारूत उडवली होती ..आईच्या मागे तगादा लावून ..राहता बंगला विकून ते पैसे देखील याने दारूत उडवलेले ..अगदी आईचे दागिने सुद्धा याच्या उंची राहणीमाना पायी विकावे लागलेले ..मोठ्या भावाच्या लग्नात थोडेफार खर्च झाले होते ..बाकी सगळे याने चैन करून दारू पिवून उडवले ..आता सध्या आईला वडिलांची पेन्शन मिळतेय त्या वर घर चालत होते ..शिवाय मोठा भावू आईला लागले तर मदत करीत असे .. आम्ही त्याला जबरदस्तीने उचलून आणले तेव्हा त्याने आईला खूप घाण घाण शिव्या घातल्या त्याने ..ती बिचारी आमच्याकडे केविलवाणे पणे पाहत राहिली !
( व्यसनमुक्ती केंद्रात बिड्या कशा देतात हा प्रश्न वाचकांच्या मनात असेल ..एखाद्या व्यसनीला दारू अथवा दृग्स खेरीज तंबाखू अथवा स्मोकिंग याचे को-अॅडीकशन असतेच ..अशा वेळी एकदम सगळी व्यसने बंद केली तर तो अधिक बैचेन होतो ..उपचारात भाग घेण्यास मनाई करतो ..म्हणून त्याचे प्रमुख व जास्त नुकसान करणारे व्यसन बंद करण्यावर भर दिला जातो ..दारू अथवा ड्रग्स मुळे व्यसनीचे शारीरिक ..मानसिक .आर्थिक ..कौटुंबिक ..समाजिक ..अध्यात्मिक अश्या वेगवेगळ्या पातळ्यांवर नुकसान होते ..तर तंबाखू मुळे केवळ त्याचे व्यक्तिगत असे शारीरिक नुकसान होते .. म्हणून त्यातला त्यात सौम्य म्हणून आम्ही पालकांच्या परवानगीने उपचार घेणाऱ्या मित्रांना कमी प्रमाणात तंबाखू अथवा बिडी देतो ..दारू सोडून काही वर्षे झाली की तंबाखू देखील सोडायची हे अभिप्रेत असतेच )
( बाकी पुढील भागात )

प्रिन्स ...? ? ( भाग एक )


आमच्याकडे स्वतःहून उपचारांना दाखल होतोय म्हंटल्यावर मला त्या तरुण मुलाचे कौतुकच वाटले .. गोरा वर्ण ..चेहऱ्यावर दारूच्या नियमित सेवनामुळे आलेली ..पटकन लक्षात येईल अशी लालसर सूज ..सहा फुटांच्या आसपास उंची ..अंगावरचे उंची कपडे ..तसेच उंची घड्याळ ..गळ्यात सोन्याची चेन ..एकंदरीत प्रकरण मालदार असल्याची सारी चिन्हे ..सोबत त्याची आई होती ..कपाळावर कुंकू नसलेली ..सधारण पन्नाशीची ..याच्या कडे दिसणारी समृद्धीची लक्षणे मात्र तिच्या अंगावर दिसत नव्हती ..साधी साडी ..गळ्यात मण्यांची माळ ...मात्र बोलण्यातून समृद्धी अनुभवल्याचे जाणवत होते ..मी अॅडमिशन फॉर्म भरायला घेतला ..त्या तरुणाला नाव ..गाव ..पत्ता वगैरे विचारू लागलो..तो खूप प्यायलेलाच होता .. त्याची सहायक असल्यासारखी त्याची आईच उत्तरे देत गेली . ..सोबत एक मोठी बॅग भरून सामान होते ...तो सिव्हील इंजिनियर असल्याचे समजले ..वय साधारण पंचविशीचे ..आवश्यक माहिती घेवून झाल्यावर मी त्याची आणि त्याची आईची फॉर्मवर सही घेतली .,,त्याच्या आईला जायला सांगितले ..त्याचा निरोप घेताना तिचे डोळे भरून आले ..आम्हाला हा अनुभव नेहमीचा असतो ..व्यसनीला उपचार केंद्रात दाखल करायला सोबत स्त्रिया आल्या असतील तर त्या हमखास रडतात .." आप चिंता मत किजीये ..हम पुरा खयाल रखेंगे उनका ..असा तिला धीर देण्याचा प्रयत्न केल्यावर ..म्हणाली " इसके पहेले कभी हमसे दूर नही रहा है वो ..इसलिये चिंता होती है..मै इसे थोडी पिने के लिये मना नही करती ..लेकीन ये जादा पिता है..बिलकुल मानता नही किसीकी ..इसका बडा भाई मुंबई में रहेता है..उसने भी बहोत समझाया ..इसके पिताजी गुजर जाने के बाद से जादा ही पिने लगा है....आईचे परक्या व्यक्तीसमोर असे गहिवरून रडणे त्याला पसंत पडले नसावे ..त्याने नापसंतीदर्शक मान हलवली ..तिने धरून ठेवलेला त्याचा हात सोडवून घेतला ..त्याला मी आमच्या कार्यकर्त्या सोबत वार्डात जायला सांगितले ..
...त्याची लांबच्या प्रवासाला नेतात तशी चाके असलेली भरगच्च भरलेली बॅग तो आतमध्ये नेवू लागताच मी त्याला थांबवले .." आपका सारा सामान..बाद में मिल जायेगा आपको..चेकिंग होने के बाद " हे त्याला आवडले नाही ..बॅग आत्ताच आत घेवून जातो असा हट्ट करू लागला .आमचे सामानाबाबत बोलणे एकूण जायला निघालेली त्याची आई मागे वळली ..म्हणाली .." सामान उसे अभी दे दिजिये ....बाद में क्यो ? " आम्ही दाखल झालेल्या व्यक्तीचे घरून आलेले समान पूर्ण तपासूनच आत पाठवतो ..कारण त्यात अनेक किमती तसेच धोकादायक वस्तू असू शकतात ..उंची परफ्युम्स ..डीओडरंटस ..आफ्टरशेव स्प्रे ..दाढी करण्यासाठीच्या कीट मध्ये असलेले ब्लेडचे पाकीट सर्वात जास्त खतरनाक असते ..त्या ब्लेडचा वापर करून काही लोक स्वतःला तसेच इतना इजा करू शकतात....लवकर घरी सोडले जावे म्हणून त्यांचे हे ' इमोशनल ब्लॅकमेल " असते तसेच काही आफ्टरशेव स्प्रे मध्ये सौम्य प्रमाणात अल्कोहोल असते ..एखादा व्यसनी त्या वासाने ती स्प्रे ची अख्खी बाटली पिवून टाकण्याचा धोका असतो ..काही उंची सामान वार्डात गहाळ होण्याची भीती असते ..अनुभवातून आलेल्या या शहाणपणा मुळे आम्ही सामान पूर्ण तपासूनच वार्डात पाठवतो .बॅग आत्ताच आतमध्ये नेतो हा हट्ट तो सोडेना ..त्याची आई देखील त्याला दुजोरा देवू लागली ..मला थोडा संशय आला हा हट्ट पाहून ..ठीक है..अभी चेक करके देता हु आपको असे म्हणत मी त्याची बॅग तपासायला घेतली ..माझ्या अंदाजाप्रमाणे उंची वस्तू होत्याच आतमध्ये ..एकदम तळाला हात घातल्यावर मी चमकलो ..एक मोठी बाटली लागली हाताला ..मी ती बाहेर काढली व्हिस्कीचा भरलेला सीलपॅक खंबा ..मी बाटली बाहेर काढताच त्याने बाटली वर झडप घातली ..माझ्या हातातून बाटली काढून घेतली ..ये मुझे लगेगी ..असे म्हणू लागला .." बाबा रे तू व्यसन मुक्ती केंद्रात व्यसन सोडण्यासाठी आलेला आहेस ..तुला आम्ही दारूची भरलेली बाटली आत कशी नेवू देणार ...तू हे सगळे बाहेरच संपवून येथे यायला हवे होतेस..असे मी त्याला समजावू लागलो ..त्याच्या आईला सांगितले तसे की त्याला तुम्ही आत्ता घरी घेवून जा ..पूर्ण बाटली संपवल्यावर या परत घेवून ..यावर ती अगतिक पणे म्हणाली की ' बाटली लेकर दी उसे तभी वो अॅडमिट होने के लिये तैयार हुवा है ..वैसे तो वो आनेके लिये तैयार नही था .. म्हणजे याच्या स्वतःहून येथे दाखल होण्याचे रहस्य हे होते तर ..' देखिये कोई भी चीज एकदम नही बंद कर सकते है ना....इसे ये थोडी थोडी दे देना तीनचार दिन ..फिर खतम हो जायेगी ' त्याची आई मला समजावू लागली ..यावर मी त्यांना स्पष्ट सांगितले ..उनको शराब ना मिलने के कारण कोई भी शारीरिक मानसिक परेशानिया होगी उसके लिये हम दवायें देते है .. शराब जरुरी नही होती है ..
तिला तत्वतः माझे बोलणे पटत होते ..मात्र मुलाबद्दलचे प्रेम आडवे येत होते ..तो दारू पिण्याच्या निमित्ताने एकदा बाहेर गेला की परत इथे यायला तयार होणार नाही असे तिचे म्हणणे पडले ..त्याला कसातरी बाबापुता करून तिने व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत आणले होते ..त्यामुळे ती त्याला परत न्यायला देखील तयार होईना ..शिवाय त्याला इथेच आफिस मध्ये बसून पिवू द्या असा हट्ट करू लागली .. अतिशय अगतिक पणे ती माझ्याकडे पाहत राहिली ..मी पेचात पडलो ..शेवटी त्याची नाही पण मला तिची दया आली ..मी त्याला आॅफीस मध्ये बाजूला कोपऱ्यात बसून ती बाटली संपवण्यास परवानगी दिली ..तो आनंदून मला ग्लास मागू लागला ..मी त्याला एक पाणी पिण्याचा स्टीलचा ग्लास आणि पाण्याची बाटली दिली ..कांच का ग्लास नही है क्या असे विचारत माझ्या उत्तराची वाट न पाहता तो अधीरतेने बाटली उघडू लागला ..पाउण ग्लास दारू आणि अगदी थोडे पाणी टाकून त्याने अधाश्या सारखा ग्लास तोंडला लावला ..दोन दमांत ग्लास संपवला देशी दारू पितात तसा ..मग जीन्सच्या मागच्या खिश्यात हात घालून ..छोटे खारे दाण्याचे पाकीट काढून त्यातील दाणे मजेने खावू लागला ..त्याची आई न मी दोघेही त्याच्याकडे हतबल होऊन पहात होतो..वाटले बाटली हिसकावून घ्यावी चार कार्यकर्ते बोलावून याला सक्तीने वार्डात पाठवावे ..पुन्हा त्याच्या आईचे भरलेले डोळे पाहून मी स्वतःला आवरले ..त्याला जबरदस्ती वार्डात नेले असते तर ती धाय मोकलून रडली असती नक्कीच !
( बाकी पुढील भागात )

Friday, November 7, 2014

आखरी अदालत ! ( भाग तीन )


आत्महत्येच्या प्रयत्नात एक पाय जायबंदी करून बसलेली उषा ..कसेतरी घरकाम सांभाळून तिचा तयार कपडे विक्रीचा व्यवसाय देखील घरूनच करत होती ..पूर्वी पाय चांगला असताना ती काही परिचित घरी जावून कपडे विक्री करे त्यामुळे विक्री चांगली होती होती ..मात्र आता घरबसल्या हा व्यवसाय करणे जास्त लाभदायक ठरत नव्हते ..कसेतरी भागत होते ..रमेशचा भाऊ अगदी काही कमी पडले तर मदत करत असे आपल्या वहिनीला..त्याच दरम्यान रमेशचे वडील वृद्धापकाळाने निधन पावले ..उषा जास्तीच सैरभैर झाली .सासऱ्याचा थोडा तरी आधार होता तिला .. रमेशच्या वडिलांनी ते राहत असलेला फ्लॅट..उषाच्या नावावर घेवून दिलेला असल्याने डोक्यावरचे छप्पर तरी शाबित होते ..तसेच नवीन फ्लॅट सोबतच फर्निचर ..फ्रीज ..अशा वस्तू देखील वडिलांनी घेवून दिल्या होत्या ..त्यातील हलके समान रमेशने कधीच विकले होते .. रमेश दिवसभर बाहेर व्यसनासाठी मिळेल ते काम करू लागला ..हमाली ..गर्दुल्ल्या मित्रांसोबत छोट्या चोऱ्या..नाहीतर कोणातरी श्रीमंत गर्दुल्ल्या सोबत एक दोन दम मिळतील या आशेने दिवसभर लाचारीने फिरणे ..मिळेल ती नशा करणे सुरु होते ..दारू ..गांजा ..आणि जमेल तेव्हा ब्राऊन शुगर ..याच्या व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी खर्च करणे म्हणजे पैसे वाया घालवण्यासारखे आहे या विचाराने ..कुटुंबीयांनी त्याला उपचार देणे बंद केले होते ..तू आणि तुझे नशीब ..असे सांगून हात वर केले होते भावाने .. अंधारमय भविष्याकडे वाटचाल सुरु होती रमेश ..उषा ..त्यांचा मुलगा विजय ..आणि दहा बारा वर्षांची मुलगी जया यांची ..कधी ना कधी रमेशला उपरती होऊन तो कायमचा नशा बंद करेल ही आशा देखील मवळू लागलेली ..
एकदा सकाळी सकाळी घराबाहेर पडलेला रमेश दुपारी बारा वाजता घरी आला ..मला फक्त वीस रुपये दे म्हणून उषाच्या मागे लागला ..उषा त्या वेळी लंगडत स्वैपाकघरात काम करत होती ..घरात अजिबात पैसे नाहीत म्हणून तिने रमेशला पैसे देण्यास नकार दिला ..रमेशला माहिती होते कि हिने कुठेतरी पैसे लपवलेले असणार .तो भुणभुण करत एकेक डबे शोधत राहिला ..स्वैपाक करता करता रमेशची अशी कटकट सुरु होती उषाच्या मागे..तितक्यात मुलगा विजय डोके दुखते आहे म्हणून दुकानातून लवकर घरी परत आला ..तो बाहेरच्या खोलीत पडून टी.व्ही पहात पडून राहिला ..त्याने आईला डोके दुखते आहे म्हणून बाहेरच्या खोलीतूनच ओरडून लिंबाचे सरबत करून मागितले ..रमेशच्या कटकटीने उषाचे डोके उठले होते ....मन अस्थिर झालेले ..तिने भांडी ठेवण्याच्या रॅक मध्ये ठेवलेला चाकू काढून घेतला लिंबू कापण्यासाठी ..तो चाकू उजव्या हाताच्या मुठीत पकडूनच ..फ्रीजचे दार उघडून उषा त्यातील लिंबू काढायला गेली ..उजव्या हाताच्या मुठीत चाकू ..त्याच हाताच्या दोन बोटांनी खाली वाकून तिने फ्रीज उघडला ..त्यावेळी नेमके फ्रीजचे दार हलके लागलेले होते ..तिला दार नीट लागलेले नाही याची कल्पना नसल्याने तिने जरा जोर लावून दार उघडले..हलके लागलेले दार जोर लावताच एकदम उघडून उषाच्या अंगावर आले ..खाली वाकलेल्या उषाच्या उजव्या हातातील चाकू तिच्याच छातीत शिरला ..अगदी खोल ..उषा किंचाळी मारून खाली पडली ..रमेश तेथेच तिच्या मागे उभा होता ..उषा खाली पडताच रमेश घाबरून आरडाओरडा करू लागला ..तिच्या छातीत घुसलेला चाकू त्याने काढला ..उषाची किंचाळी आणि रमेशचा आरडाओरडा ऐकून मुलगा विजय देखील स्वैपाक घरात पळत आला ..दोघा बाप लेकांनी उषाला उचलून बाहेरच्या खोलीत आणले ..मुलाने धावत जावून ऑटो आणला ..सगळीकडे फोनाफोनी झाली...ऑटोतून उशाला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले ..तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले ..पाच मिनिटात हे सगळे नाट्य घडले होते ..हलके लागलेले फ्रीजचे दार .. हातात चाकू घेवून खाली वाकलेली उषा ..अगदी जमून आला होता मृत्यूचा योग ..
हा अपघात आहे यावर पोलीस विश्वास ठेवायला तयार नव्हते ..रमेशची माहिती काढली तेव्हा रमेश व्यसनी आहे हे समजलेच पोलिसांना .शिवाय तो नेमका त्याच वेळी स्वैपाकघरात होता ..उशाला पैसे मागत होता ही माहिती त्यांना मुलाकडून मिळाली ..मुलाने जरी प्रत्यक्ष आत काय घडले हे पहिले नसले तरी ..बाप आईकडे पैसे मागत होता ...त्यांचा वाद सुरु होता हे मुलाने बाहेरच्या खोलीतून ऐकले होते ..नंतर उषाची किंकाळी ..सगळे गणित जमवले पोलिसानी ..रमेशनेच पैसे मिळवण्याच्या झटापटीत उषाचा खून केला असा निष्कर्ष निघाला ..उषाच्या छातीतील चाकुवर पण रमेशच्या बोटांचे ठसे होतेच ..रमेशवर पत्नीच्या खुनाचा खटला भरला गेला ..रमेश व्यसनी आहे याला त्याच्या भावाने देखील दुजोरा दिला ..रमेश कळवळून सांगत होता हा अपघात आहे ..तो कसा घडला ते देखील त्याने कानी कपाळी ओरडून सांगितले पोलिसांना ..मात्र कोणीच रमेशवर विश्वास ठेवायला तयार नव्हते ..भावू म्हणाला जरी क्षणभर आपण मानले की तो अपघात होता आणि आम्ही तुला जमीन देवून..तसेच चांगला वकील देवून या खटल्यातून सहीसलामत सोडवला तरी पुढे काय ? ..तू काही व्यसन सोडणार नाहीस ..उलट आईविना पोरक्या मुलांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून ठेवशील ..त्यापेक्षा तू होईल ती शिक्षा भोग ..तोवर आम्ही तुझ्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी तरदूत करू ..मुलीचे लग्न करून देवू सुस्थळी ..रमेश हतबल होता परिस्थिती पुढे ..त्यापेक्षा तू जेलमध्ये जा ..तेथे खात्रीने व्यसनमुक्ती मिळेल तुला ..रमेशला जेलमध्ये जावेच लागले ..सरकार मार्फत त्याला वकील दिला गेला ..मात्र तो वकील देखील रमेश निर्दोष आहे याबाबत सांशकच होता ..रमेशच्या कुटुंबियांची तर रमेशला शिक्षा व्हावी हीच इच्छा होती ..रमेश जेल मध्ये सर्वाना तो अपघात आहे हे सांगत राहिला ..आला दिवस काढत राहिला ..खटल्याचा निकाल लागायची वाट पहात..त्याला सतत पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रात शेवटचे उपचार घेताना समुपदेशकाने सांगितलेले आठवत होते .." बाबा रे सांभाळ ..जोवर माणसे तुझ्या सुधारणे साठी प्रयत्न करत आहेत तोवर सुधार ..जर निसर्ग यात दखल देईल ...तर असे मोठे नुकसान होईल की जन्मभर पश्चाताप केला तरी भरून निघणार नाही ..अगदी तसेच घडले होते..निसर्गाने म्हणा किवा परमेश्वराने म्हणा ..मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी आपला निर्णय दिला होता ..निसर्गाच्या कोर्टात न्याय झाला होता ..बिचाऱ्या उषाला हकनाक जीव गमवावा लागला त्यासाठी ..!
( समाप्त )
( टीप ..रमेश मला नाशिकच्या सेन्ट्रल जेल मध्ये डिसेंबर २००१ साली भेटला होता ..मी जेलमध्ये आलोय हे समजल्यावर मला भेटायला आला होता ..खूप रडला ..तुषार भावू तुम्ही काहीतरी आयडिया सुचवा म्हणून विनंती केली मला ..माझ्या मुक्तांगणच्या पहिल्या उपचारांच्या वेळी १९९१ साली तो माझ्या सोबतच दाखल होता तेथे .. तो नाशिकचाच असल्याने नंतरही माझ्या संपर्कात होताच ..उषावाहिनी ..रमेशचे वडील ..मुलांना देखील मी व्यक्तिश: ओळखत होतो ...रमेशचा स्वभाव मला चांगला माहित होता ..तो तसा मवाळ प्रवृत्तीचा होता ..तो पत्नीचा खून करू शकेल असे मलाही वाटत नाही ..परंतु सगळे परिस्थितीजन्य पुरावे रमेशच्या विरोधात होते ..पुढे रमेशचे काय झाले ते समजले नाही ..कदाचित एव्हाना तो शिक्षा भोगून बाहेर पडला असेल ..किवा जेल्मध्येच त्याची जीवनयात्रा संपुष्टात आली असेल )